Showing posts with label समकालीन नाटक. Show all posts
Showing posts with label समकालीन नाटक. Show all posts

Wednesday, May 6, 2020

नव्वदोत्तरी कविता : समकालीन सामाजिक- सांस्कृतिक वास्तवाचा वाङ्मयीन लेखालोखा


नव्वदोत्तरी कवितेत मात्र या बांधिलकी आणि व्यक्तित्व यांना टाळून कविता समोर आल्याचे दिसते. त्याचे कारण उत्तरआधुनिकतेत या दोन्ही मूल्यांना महत्त्व राहिले नाही. उत्तरआधुनिक तत्वज्ञान आधीच्या सर्व तत्त्वज्ञानाचा आणि मूल्यांचा अंत (death) घडवून आणते आहे. त्यामुळे आधुनिकतेत समाजाचे विघटन घडून आले तर उत्तरआधुनिकतेत व्यक्तित्त्वाचे विघटन घडून आले आहे. 

---------------------------------------------------------------
एक नागरिक म्हणून कवी व सामान्य माणूस यात काही भेद नसतोच. सुख-दु:खे, समस्या, व्यथा वेदना, प्रपंच हे नागरिक व कवी दोघांनाही लागू असते. नागरिक म्हणून दोघांचे अनुभवही सारखेच असतात. मात्र कवीजवळ दोन गोष्टी सामान्य माणसांपेक्षा जास्त असतात : संवेदनशीलता आणि प्रतिभा. 
या दोन शक्तीमुळे त्याची जाणीव वेगळी ठरते आणि त्याच्या अनुभवाची प्रतही बदलते. ज्ञानेंद्रिये व त्यांच्या संवेदना आणि मन व भावना यांच्या तीव्रतेमुळे कवीला जीवनाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची क्षमता  प्राप्त होते. त्याला विचारसरणीची, तात्त्विक भूमिकेची, चिंतनाची जेव्हा जोड लाभते. त्तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा एक असामान्य दृष्टिकोन कवीला प्राप्त होतो. तात्पर्य, संवेदना-भावना व विचार यांच्यामुळे कवीला येणाऱ्या अनुभवाचे स्वरूप सामान्य नागरिकांना येणाऱ्या अनुभवापेक्षा भिन्न असते.
कवीच्या बाबतीत नुसता अनुभवच नव्हे, तर त्या अनुभवाचे भाषिक प्रकटीकरण देखील भिन्न असते. कारण कवीजवळ असलेली दुसरी शक्ती, प्रतिभा; ही त्याच्या या आविष्काराला अन्योन्य रूप देत असते. ही प्रतिभा सर्जनशील भाषिक प्रकटीकरण करत असल्यामुळे कवीचा अनुभव व त्याचा भाषिक आविष्कार हा सामान्य नागरिकापेक्षा भिन्न असतो. त्याच्या भाषिक सर्जनाची नोंद घ्यावी लागते ते यामुळेच. म्हणजे कवी आपली सभोवतालच्या वास्तवाकडे भावना-संवेदनशीलतेने पाहत असतो. त्याचे आपल्या मूल्यदृष्टीने विश्लेषण करत असतो. प्रातिभ शक्तीने सर्जनशील भाष्य करतो. याच्या जोडीला कवीचेही अनन्य व्यक्तिमत्त्व असल्याने, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंबही कवितेत पडत असते.           
कवितापूर्व स्थिती अशी असते.
कवितेची निर्मितीसुद्धा एक जिवंत व सेंद्रिय प्रक्रिया असते. म्हणून तिचे रूप स्थिर नसते व   आस्वाद एकच एक नसतो. त्याला कारण तिची ही निर्मितिप्रक्रिया असते. तिच्यामुळे कवितेच्या आशयात नावीन्य  व रूपात सौंदर्य प्रकटत असते. यामुळे कवितेतील समाजाचे दर्शन असे अन्योन्य असते.
कवितेचे स्वरूप असे असते.
वाचक वास्तवाच्या अशा अन्योन्य आकलनासाठीच कविता वाचत असतो. त्याचवेळी तो कवितेच्या या निर्मितिप्रक्रियेतही कळत-नकळत सहभागी होत असतो. त्याचेही जीवनभान, आकलन व व्यक्तिमत्त्व या आस्वादाच्या प्रकियेत सहभागी होत असते; म्हणून त्याचा आस्वादही अन्योन्य होत जातो. वाचक, त्याचे व्यक्तिमत्त्व, त्याची रसिकता, त्याची अभिरुची, त्याच्यावरील वाङ्मयीन संस्कार यांसह कवितेला सामोरा जात असल्याने त्याचा काव्यानुभव मुळातील कवितेला अधिक समृद्ध आणि अधिक व्यापक करीत असतो.
कवितेचा आस्वाद असा असतो.
अशाप्रकारे निर्मिती, अस्तित्व आणि आस्वाद अशा तीन प्रक्रियांतून कविता जात असल्यामुळे दरवेळी तिचे रूप बदलत, विकसित होत असते; ती वाचकाला दरवेळी भिन्न भिन्न आस्वाद देत असते.
समीक्षा अशा आस्वादोत्तर अनुभवाचे विश्लेषण करीत असते. समीक्षेचे वाचन करणाऱ्या तटस्थ वाचकाला; त्या विवेचनातून कवीचे व्यक्तिमत्त्व, कवितेचे स्वरूप, आस्वादकाची अभिरुची; कवितेच्या  सामाजिक आशयातून समाज-संस्कृती, तिच्यातील मानवी क्रिया-प्रतिक्रिया, घटना व मानवी इतिहास-- यांचा अर्क गवसत असतो. त्यालाच समीक्षेच्या परिभाषेत ‘आशयसूत्रे’ म्हणतात. ही आशयसूत्रे समाजाचा वाङ्मयीन लेखाजोखाच असतो. म्हणून साहित्यप्रकाराचा कालखंडनिष्ठ व साहित्यप्रकारनिष्ठ आढावा घेणे गरजेचे असते.  
‘सर्वधारा’चा ‘नव्वदोत्तरी काव्य विशेषांक’ हा असाच कालखंडनिष्ठ व साहित्यप्रकारनिष्ठ आढावा होय. त्यातीलआशयसूत्रांच्या आधारे आपण समकालाविषयी, कवी आणि कवितांविषयी काही अंदाज बंधू शकतो. त्यातून आपल्या सामाजिक- सांस्कृतिक आकलनात भरच पडते.
या अंकात ‘नव्वदोत्तर कवितेची सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी’ (प्रवीण बांदेकर), ‘नव्वदोत्तरी मराठी कविता : बदलत्या वास्तवाची वाङ्मयीन प्रतिक्रिया’ (सत्यपालसिंग आधारसिंग राजपूत), ‘नव्वदोत्तर महानगरी कविता’ (दा. गो. काळे ), ‘नव्वदोत्तरी ग्रामीण कविता’ (केशव सखाराम देशमुख), ‘नव्वदोत्तरी स्त्रीवादी काव्य’ (नीलिमा गुंडी), ‘नव्वदोत्तरी मराठी आदिवासी कविता’ ( विनोद कुमरे), ‘नव्वदोत्तरी आंबेडकरवादी कविता’ (भूषण रामटेके) असे सात लेख अत्यंत मौलिक निरीक्षणे नोंदवणारे व विश्लेषण करणारे आहेत.
हे सर्व लेखक वेगवेगळ्या वाङ्मयीन प्रवाहाशी संबंधित असलेले, वेगवेगळ्या प्रादेशिक गटातील व वयोगटातील, वेगवेगळ्या सामाजिक-सांस्कृतिक प्रांतातील अभ्यासू, व्यासंगी आणि स्वत: कवीही आहेत. तरीही ते ज्या साहित्यप्रवाहाशी व साहित्यप्रकाराशी (कविता) संबंधित आहेत, त्याची भलावण न करता अत्यंत तटस्थपणे, मार्मिक निरीक्षणे आणि परखड मते नोंदवत; या काव्यातील आशयसूत्रे, त्यांची भाषिक वैशिष्ट्ये आणि प्रवाहाच्या-कवीच्या मर्यादासुद्धा त्यांनी सांगितल्या आहेत. त्या मर्यादांमागील कविनिर्मित, सामाजिक-सांस्कृतिक व वाङ्मयीन अशा कारणांची मीमांसाही केली आहे.
१९९० नंतरच्या काव्याविषयी अशी एकत्रित व मौलिक नोंद उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे व प्रमुख संपादक सुखदेव ढाणके यांचे विशेष आभार मानतो. या लेखांमधील निरीक्षणे नुसते वाचक, नागरिक यांनाच नव्हे तर समकाळात लिहिते असणाऱ्या कवींनाही नवे भान देणारे आणि त्यांची जबाबदारी अधोरेखित करणारे आहेत. आपल्या समकालाविषयी भांबावलेल्या नागरिकांनाही यांतून आपला समकाल व त्याचे सामाजिक-सांस्कृतिक स्वरूप, पेच व त्यामागील कारणे यांचा वेध घेता येणार आहे. आपल्या भोवताल समाजात काय घडते आहे, का घडते आहे ही माहिती वाचकाला; तर अशा घडत्या इतिहासाची वाळू कशी घट्टपणे पकडून आपल्या कवितेतून साकारायची याची कवींना प्रेरणा मिळणार आहे.
कविता ही एका वाङ्मयीन परंपरेत जशी निर्माण होते, तशी ती एका सामाजिक-सांस्कृतिक परंपरेतही निर्माण होत असते. त्यामुळे ती एका बाजूने वाङ्मयीन परंपरेचा वारसदार असते आणि या अर्थाने तिचा शोध म्हणजे कवितेचा उभा छेद असतो; तर दुसऱ्या बाजूने ही समकालावरचे भाष्य असते आणि या अर्थाने तिचा शोध म्हणजे कवितेचा आडवा छेद असते. समीक्षेला हे दोन्ही ताणेबाणे समजून घ्यावे लागते. जे या लेखांमधून नीटपणे उलगडल्या गेले आहे.
             कवी प्रवीण बांदेकर यांनी आपल्या लेखातून नव्वदोत्तरी कवितेची सामाजिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी मांडली आहे. ही पार्श्वभूमी जागतिकीकरणाची असून जागतिकीकरणामुळे सांस्कृतिक सपाटीकरण होण्याची प्रक्रिया कशी घडते आहे; त्यावर खास आपल्या सांस्कृतिक घटिते, मूल्यव्यवस्था, भाषा, कवितेची रचनातंत्रे यांची गरज (देशीयता) बोलून दाखवली आहे. त्यांना जागतिकीकरण आपल्या सांस्कृतिक जीवनावरील आक्रमण वाटत असून त्याच्यामुळे सत्ताकांक्षा, न-नैतिक राजकारण, त्यातून निर्माण होणारे अराजक, मूलतत्त्ववाद, आपल्या भूप्रदेशाची भाषा-संस्कृती इत्यादी अस्तित्वाची अनिश्चितता वाढत गेली आहे. या पार्श्वभूमीवर नव्वदोत्तरी कविता सामोरे आली आहे. ऐंशीच्या दशकातील कवींना क्वचितच असणारे ‘राजकीय भान’ मात्र या नव्वदोत्तरी कवींना असल्याचे आणि हे भान विशिष्ट विचारसरणीशी बांधिलकी न जोपासल्यामुळे अधिक व्यापक झाल्याचे सूचनही त्यांनी केले आहे.
            साठोत्तरी कवींना हे भान तुलनेने कमी आहे. ही कविता बांधिलकीबाबत जास्त बोलत होती. याचा अर्थ या कवींनी ‘आंधळी बांधिलकी’ जोपासल्यामुळे त्यांच्या कवितेतील राजकीय भान धूसर झाले असे मानण्यास जागा आहे. मराठीत १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात सामाजिक बांधिलकीचा विषय पुढे आला. त्यावेळी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती; साहित्यप्रवाह आणि साहित्यनिर्मिती यात प्रचंड उलथापालथ होत होती. त्याचे वर्णन रा. ग. जाधव यांनी केले आहे: “आर्थिक विषमता, सामाजिक अन्याय, आंधळे व एकांगी कायदेकानू व त्यांचे तशाच जातीचे न्यायालयीन निष्कर्ष, नवजागृत सामाजिक वर्गाची सांस्कृतिक अस्मिता, विविध आर्थिक गटांच्या विषम आर्थिक सत्ता, विद्रोहाच्या जाणिवा, परंपरागत संस्था व रितीरिवाजांचे वांझोटे अस्तित्व, यांसारख्या कारणांनी रूढ सामाजिक व्यवस्था बाद करून समग्र क्रांतीची आवश्यकता निर्माण झाली.” (रा. ग. जाधव: १९८५ :७४) या समग्र क्रांतीच्या गरजेपोटी ही बांधिलकीचा आग्रह धरण्यात आला होता. ती तत्कालीन महाराष्ट्राची गरज होती.
            मात्र, बांधिलकीच्या विशिष्ट विचारप्रणालीशी बद्ध झाल्यामुळे, ‘कवीला ‘माणूस’ तत्त्वापेक्षा कामगार, दलित, शेतकरी अशी आवरणे महत्वाची वाटू लागतात. त्याची निष्ठा कर्मठ होत जाते. व्यक्तिमत्त्वाचा लवचिकपणा कमी होतो. तो विशिष्ट ज्या पंथ व पक्षाला बांधील असतो त्या विचारसरणीच्या साच्यातच त्याला आपले अनुभव बसवावे लागतात. कालांतराने त्याची अनुभवसरिता आटून जाते. आंधळ्या बांधिलकीचा असा धोका असतो. अशा बांधिलकीमुळे विषयाला महत्त्व प्राप्त होते, अनुभव व त्याची अर्थपूर्णता विचारात घेतली जात नाही.(म. सु. पाटील:२००१: ७६) हा धोकाही असतो. ही साठोत्तरी कवितेची  मर्यादा होती, जी नव्वदोत्तरी कवितेने ओलांडली आहे असे दिसते.
            साठच्या दशकात चळवळीच्या कप्प्यातच आपली प्रतिभा आणि निर्मिती कोंबावी लागत होती. आता चळवळी व विचारसरणी यांचा प्रभाव ओसरल्याने त्यांच्या बाबतचे तटस्थ भान आले आहे. उदा. लोकनाथ यशवंत, राम दुतोंडे, अरुण काळे आदी कवींनी दलित चळवळीचा ओसरलेला बहर याबद्दल भाष्य आणि त्यातील वाढता राजकीय स्वार्थ यांवर प्रहार केल्याचे दिसते. त्यामुळे म. सु. पाटील यांनी सांगितलेल्या आंधळ्या बांधिलकीच्या मर्यादातून हे नवे कवी मुक्त झाल्याची नोंद बांदेकरांनी केली आहे.
            बांदेकरांच्या लेखात ‘कवीचे व्यक्तिमत्त्व’ या महत्त्वाच्या मुद्द्याचा विचार येतो. नव्वदोत्तरी काळात ‘कवीच्या व्यक्तिमत्त्वाचा लोप’ झाल्याचे त्यांना जाणवते. परिणामी ‘एकेका कवीचा, त्याच्या आशयाचा, शैलीचा विचार’ स्वतंत्रपणे करता येत नाही; उलट ‘संपूर्ण पिढीच्या कवितेचा, पिढीच्या युगशैलीचा विचार करावा लागतो’. अनेक नव्वदोत्तरी कविता सारख्याच वाटतात, त्याचेही कारण हेच होय.
            असेच निरीक्षण दा. गो. काळे यांनीही नोंदवले आहे. नव्वदोत्तरी महानगरी कविता ‘वेगवेगळ्या संचितातून आलेल्या विविध मानवी समूहाचा कोलाज’ आहे, असे ते म्हणतात. त्याचेही कारण कवीचे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व कवितेतून उमटत नाही, हेच होय. ‘जागतिकीकरणातून आलेल्या एकसुरी, एकखिडकी चकचकाटामुळे मानवी अस्तित्त्वाचा, त्याच्या असण्याचा लोप होतो.’ हे कारण त्यांनी सांगितले आहे. मुळात हे कवीच्या व्यक्तित्त्वाचे विघटन होय.
            व्यक्तित्त्वाचे विघटन ही खरे तर उत्तर आधुनिकतेची प्रक्रिया आहे. ‘जीवन हे अस्थिर, सतत बदलणारे, प्रवाहाच्या स्वरूपाचे, तुकड्यातुकड्यांनी बनलेले आणि विरोधाभासांनी युक्त आहे; वास्तव हे बुद्धिगम्य नसून व्यक्तिनिष्ठ, मनोनिष्ठ, अंतर्गत, सापेक्ष स्वरूपाचे आहे,’ या जाणिवेला दुसऱ्या महायुद्धामुळे या अधिक वेग आला. युरोपात सामाजिक व सांस्कृतिक जीवनात आधुनिकतावादामुळे अस्थिरता, दुभंगलेपणा निर्माण होऊन ‘स्व’ विघटन घडून आले आहे. (मिलिंद मालशे- अशोक जोशी: २००७: २६)
            आपल्याकडे आधुनिकतेची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर कवीच्या व्यक्तित्त्वाचा आग्रह पहिल्यांदा केशवसुतांनी आपल्या काव्यात धरला. कवीचे स्वातंत्र्य, कवीचे व्यक्तिमत्व, कवीचे सामाजिक उत्तरदायित्व आणि सामाजिक बांधिलकी हे केशवसुत संप्रदायाचे वैशिष्ट्य डॉ. द. भि. कुलकर्णी यांनी नोंदवले होते. (दोन परंपरा, विजय प्रकाशन, नागपूर) तात्पर्य आधुनिक कवितेत बांधिलकी आणि कवीच्या व्यक्तित्त्वाचा आग्रह होता. तो साठ्पर्यंतच्या मराठी कवितेपर्यंत दिसून येतो. कवीच्या व्यक्तित्वाला महत्त्व देणारा गोविंदाग्रज-बालकवी-मर्ढेकर-चित्रे-कोलटकर असा एक; तर बांधिलकी मानणारा केशवसुत-मुक्तिबोध-सुर्वे-ढसाळ असा दुसरा प्रवाह मराठीत दिसतो. त्यांना मुक्तिबोधांनी व्यक्तिवादी-संरचनाप्रधान, निराशावादी परंपरा व दुसरी आशयवादी परंपरा असे संबोधले होते. (प्रस्तावना, नवी मळवाट)
            नव्वदोत्तरी कवितेत मात्र या बांधिलकी आणि व्यक्तित्व यांना टाळून कविता समोर आल्याचे दिसते. त्याचे कारण उत्तरआधुनिकतेत या दोन्ही मूल्यांना महत्त्व राहिले नाही. उत्तरआधुनिक तत्वज्ञान आधीच्या सर्व तत्त्वज्ञानाचा आणि मूल्यांचा अंत (death) घडवून आणते आहे. त्यामुळे आधुनिकतेत समाजाचे विघटन घडून आले तर उत्तरआधुनिकतेत व्यक्तित्त्वाचे विघटन घडून आले आहे.
            फ्रेंच लेखक रोलाँ बार्थ याने ‘लेखकाचा अंत’ ही संज्ञा मांडली आहे. आधुनिक काळात, लेखक हा पिता व लेखन त्याचे अपत्य मानले जात होते. साहित्याच्या केंद्रस्थानी लेखक व त्याचे व्यक्तित्व असायचे. फ्रेंच कवी मलार्मे याने लेखकाच्या जागी भाषेला केंद्रस्थानी आणले. बार्थने लेखकाची सर्वसाक्षी व सर्वव्यापी उपस्थिती नाकारत वाचकाला महत्त्वाचे स्थान मिळवून दिले. वाचकाने संहितेचे सर्व धागेदोरे धरून ठेवलेले असतात, वाचकाचा जन्मच मुळी लेखकाच्या अंतातून होतो, अशी त्याची संकल्पना आहे. (संज्ञा –संकल्पना कोश, २८६)
            तात्पर्य कवीच्या व्यक्तित्वाचे विघटन म्हणजे लेखकाचा अंत ही प्रक्रिया नव्वदोत्तरी कवितेत प्रकटली असून ती उत्तरआधुनिक आहे. या मराठी कवितेची वाटचाल उत्तरआधुनिकतेकडे होऊ लागली आहे. मात्र मराठी समीक्षा अजूनही त्या अर्थाने काव्याकडे पाहताना दिसत नाही. मिलिंद मालशे- अशोक जोशी, हरिश्चंद्र थोरात, वसंत आबाजी डहाके यांनी सैद्धांतिक तर वसंत आबाजी डहाके, दा. गो. काळे, विश्राम गुप्ते, इत्यादी मोजके समीक्षक काव्याची उत्तरआधुनिक समीक्षा करत आहेत.
             बांधिलकी आणि व्यकित्वाचे विघटन ही गोष्ट चांगली की वाईट हा प्रश्नदेखील सापेक्ष ठरेल इतकी वेगाने ती प्रक्रिया घडत आहे. कारण जग हे मोठे खेडे मानले की प्रदेशनिष्ठ व विशिष्ट काही उरत नाही. तसे विशिष्ट शिल्लक राहिल्यास एकच वस्तू सर्वत्र कशी विकता येईल? प्रत्येक प्रदेशाचा पेहराव व खानपान यांत विविधता राहिली तर कंपन्यांना जगभर पिझ्झा-बर्गर आणि जीन्स व टी-शर्ट कसे विकता येतील? म्हणून या सपाटीकरणाच्या प्रक्रियेला सारेच बळी पडत आहेत. ही विशिष्टतेच्या लोपाची प्रक्रिया आधी आर्थिक मग सामाजिक- सांस्कृतिक आणि आता वाङ्मयीन बनली आहे. बांधिलकी आणि व्यकित्वाचे विघटन हा त्याचाच परिणाम आहे.
            या विघटनाच्या व सपाटीकरणाच्या विरुद्धची प्रतिक्रिया म्हणून आपले स्वतंत्र अस्तित्व जोपासण्याची तीव्र धडपड समाजात दिसते आहे. त्याला अस्मितेच्या राजकारणाचे स्वरूप देण्यात येऊन आपली जुनी मूल्ये जोरकसपणे पुढे आणण्याचा प्रयत्न काहीजण करताहेत. हे निरीक्षणही बांदेकर यांनी नोंदवले आहे. या पुनरुज्जीवनाचे दुष्परिणाम हे सत्यपालसिंग राजपूत यांच्या लेखात दिसतात. आपल्या सांस्कृतिक अस्मितेच्या नावाखाली हा पुनरुज्जीवनवाद, मूलतत्त्ववाद समोर येतो आहे. संभ्रमित समाज पुन्हा बाबा-धार्मिक गुरु त्यांचे हायटेक पंथ याकडे वळताना दिसतो. मंदिर बांधण्यासाठी आक्रमक होतो आहे. जातवार संमेलने व मोर्चे हे त्याचेच निदर्शक होय. याचीही दखल नव्वदोत्तरी कवी घेताना दिसत आहेत, असे निरीक्षण राजपूत यांनी मांडले आहे.  
          सामाजिक मूल्यविहिनता या नव्वदोत्तरी कवितेच्या विशेषाकडे बांदेकरांनी लक्ष वेधले आहे. बाजारकेंद्री व्यवस्थेमुळे जगण्याचा प्रचंड संभ्रम आणि त्यातून कसलीही सामाजिक भूमिका नसणे ही प्रक्रिया घडून आली आली आहे. मात्र बांदेकरांच्या मते, ‘कसलीही भूमिका न घेता सुद्धा’ ही कविता सामाजिक व सांस्कृतिक संदर्भाला सामोरे जाते. याचा दुसरा अर्थ असा की, प्रचारी व घोषवाक्यात्मक बांधिलकीपेक्षा सामाजिक संवेदना व सामाजिक जाणीवच काव्यासाठी अधिक गरजेची आहे असे दिसते.
          सत्यपालसिंग राजपूत यांच्या लेखातून, ‘नव्वदोत्तर’ (Post- Ninety) ही संकल्पना जगभरातील ज्ञानशाखांत बदलती आर्थिक व्यवस्था म्हणून ‘कालिक विभाजनाची रेषा’ मानल्याचे व  ही जागतिकीकरणाची आर्थिक व्यवस्था बाजारू मूल्यांमुळे उत्तम नागरिकाचे रूपांतर चंगळवादी ग्राहकात करत आहे. हा कालखंड माणसाचे वस्तूकरण (commodification) घडवून आणणारा असून, त्यामुळे आपले सांस्कृतिक संचित नष्ट झाल्याची भावना या नव्वदोत्तरी कवितेतून तीव्रतेने येते. विशेष म्हणजे या कवितेने निसर्गाशी सहवेदना जपली असून जंगलतोड, प्रदूषण व पर्यावरण ऱ्हास याबद्दल ती बोलते आहे. तसेच ही कविता प्रेम, द्वेष, सुख, समाधान, अश्वस्थता, परात्मता, आत्मशोध, स्व-विश्व संबंधाचा शोध, वासना, भ्रमनिरास अशा सनातन मानवी जाणिवांचे पुन:प्रकटीकरण करते, असे निरीक्षण नोंदवले आहे.
          ‘नव्वदोत्तर महानगरी कविता’ या लेखातून दा. गो काळे यांनी जागतिकीकरणाच्या प्रक्रियेतील महानगरी कवितेचा शोध घेतला आहे. बाजाराचे केंद्र महानगर आणि बाजार क्रांतीचा पहिला ग्राहक महानगरी माणूस, त्याचे उत्तरआधुनिक जग ओलांडून बाजारशरण होणे, त्यातून मूल्यहीनता आणि भयाचे सावट, संचारक्रांती अशा पार्श्वभूमीची चर्चा केली आहे. या महानगरी कवितेने भाषिक आविष्कारासाठी शहरी व बोली भाषा यांचे रिमिक्स केले आहे. व्यक्तिकेंद्री वास्तवामुळे सामाजिक अस्मिता लोप पावली आहे. सुट्या सुट्या विखंडातून समाजाला आलेलं भय, त्यातून सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता, स्थिर जीवनमूल्याचा अभाव या आशयसूत्रांची चर्चा केली आहे.
           काळे यांनी या कवितेच्या मर्यादाही सांगितल्या आहेत. महानगराचा अवकाश व्यापक असून मध्यमवर्गीय माणसांव्यतिरिक्तचे कामगार, भिकारी, गुन्हेगारी, वेश्या, हिजडे, अंडरवर्ल्ड, श्रीमंत असे बहुविध जग अजून महानगरी कवितेने कवेत घेतले नाही. भाषिक पातळीवर केवळ चिन्हव्यवस्था (शब्द-प्रतिमा) म्हणजेच कविता असा समज आहे. ही या कवितेची मर्यादाही सांगितली आहे.
          केशव सखाराम देशमुख यांनी ग्रामीण कवितेची अत्यंत परखडपणे पण मौलिक चिकित्सा केली आहे. इतर सर्व प्रवाहाची कविता तिच्या समकालाला भिडताना दिसते, मात्र ग्रामीण कविता अजूनही या बाबतीत असमाधानकारक असल्याचा निष्कर्ष देशमुख यांनी मांडला आहे. खरे तर स्वत: ग्रामीण कवी असूनही त्यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व विविध कवींचा अभ्यास करून हे निष्कर्ष मांडले आहे, या बद्दल भावी अभ्यासक त्यांचे आभारच मानतील.
           त्यांच्या मते, ग्रामीण कवितेत ‘ग्रामीण’ असे नावालाच राहिले आहे. या कवितेला राजकीय भान नाही. सत्ताकारणाची गंभीर गणिते, शेतकरी आंदोलनामागची सूत्रे, म. फुले यांचे तत्त्वज्ञान, राजेंद्रसिंग राणा, अण्णा हजारे किंवा पोपटराव पवार यांचे शेतिविषयक व सामाजिक कार्य; समाज, सत्ता, धर्म, शिक्षण, उद्योग, बाजार यांचा रोख समजण्याची उणीव, या कवितेत आहे. आज ग्रामीण चळवळ संपली तरी लोकप्रिय ग्रामीण कवितेची व्यासपीठे अजूनही आहेत. गावोगाव ग्रामीण संमेलनातल्या मिरवणारी भावूक कविता निर्माण होते आहे. याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.
          ही कविता ‘माती, दगड, पाणी, शेत, घर’ यातच गुरफटलेली आहे. ‘भूतकाळ कुरवाळणारी, आई-वडिलांची कृतज्ञता पुन: पुन्हा सांगणारी, ‘माहितीवर बेतलेली आणि भावनांना हात घालणारी धोपट’ कविता असून ‘साहित्य संमेलनाच्या विविध मंचानी कवींना अफूची गोळी दिलेली’ जाणवते. ग्रामीण व्यासपीठे कवींना ‘प्रसिद्धीचे क्षणभंगुर हव्यास हातांवर गुळाचा खडा ठेवून’ संपवतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्येविषयी रोज अश्रू पुसणाऱ्या कविता येतात, पण वाङ्मयीन मेरीट सिद्ध करणारी कविता निर्माण होत नाही असे मत नोंदवले आहे. रा. ग. जाधव यांनी व्यक्त केलेली केलेली नव्वदच्या दशकातील ‘नव्या भानाची’ अपेक्षा फोल ठरली. त्याऐवजी आज ‘सपाट अर्थाची, पुष्कळ शाब्दिक, निरास गद्यप्रा:य, स्वखुशीत रमणारी’ कविता निर्माण होत असून, ‘जगण्यातील कंगोरे समजून घेण्यात, वर्तमानाची नोंद घेण्यात ही कविता अपुरी’ पडते असे निरीक्षण देशमुख यांनी नोंदवले आहे.
          ग्रामीण कवितेच्या अशा अध:पतनाची कारणे कवींजवळ असलेल्या तत्त्वज्ञानाच्या अभावात आहे. ग्रामीण कवितेला निश्चित अशा प्रेरणा व तात्त्विक भूमिका नाही. उलट इतर साहित्य प्रवाहापेक्षा सामान्य कवीलाही प्रसिद्धी व सन्मान मिळू शकेल इतकी संमेलने आणि पुरस्कारांची व्यवस्था (सहकारी तत्त्वांमुळे) उपलब्ध झाली असून त्यामुळे ही कविता फक्त माती, गाव व शिवार यांविषयी गळे काढत बसली. दु:खाच्या मुळाशी कारण असते, त्याचा शोधच तिने घेतला नाही, असा त्यांचा आक्षेप आहे.
           याचे उत्तर शोधल्यास असे जाणवते की, बहुतेक ग्रामीण कवी हे समृद्ध शेतकरी कुटुंबातील होते. त्यामुळे वाडा व शिवार ही सरंजामी व सुखावह व्यवस्था नष्ट झाल्याचे दुख: त्यांना आहे. या सुखवस्तू कवींचे ग्रामीण जीवनात बलुतेदार व वेसकर यांच्याप्रमाणे शोषण होत नाही. उलट ग्रामीण जीवनातील बहुतेक शोषणाचा केंद्रबिंदू हा  सुखवस्तू बागायतदारच असतो. त्यामुळे ग्रामीण सामाजिक शोषण हा त्यांच्या चिंतनाचा विषय होऊ शकत नाही. शिवाय विठ्ठल वाघ व ना. धों. महानोर आदी कवींनी ग्रामीण सामाजिक जीवनापेक्षा निसर्गाकडेच रोमँटिक दृष्टीने पाहिले; फारतर शहरी कवितेत रोमान्ससाठी आवश्यक असलेला असलेला निसर्ग व बगिच्या त्यांनी शेतातील निवडला इतकेच. त्यामुळे ग्रामीण कविता यांचे अनुकरण करणारी, रोमँटिक; व ग्रामीण कथा द. मा. मिरासदार, शंकर पाटील यांचे अनुकरण करणारी विनोदीच जास्त निर्माण झाली. या दोन्हींमुळे कविताच नव्हे तर ग्रामीण कथाही ती वास्तवापासून दूर गेली.
          शिवाय केशव देशमुख म्हणतात त्याप्रमाणे, आकाशवाणी, पाठ्यपुस्तक मंडळे, अभ्यासमंडळे (यावर असेच लोक असल्याने) ‘काव्यलाभाच्या गोष्टी व समीक्षामाऊलीचे प्रेम’ यांमुळे ‘कवितेचे बहुजनीकरण होऊनही’, ‘जी चिन्हे नियतकालिकातील कवींना कळली ती ग्रामीण कवितेला कळली नाही. (मुख्य म्हणजे नियतकालिकातील कवितेला व्यक्तिवादी म्हणून ग्रामीण कवी हिणवतात) यामुळे ग्रामीण कवितेचा नव्वदोत्तरी काळात काही सन्माननीय कवींचा अपवाद वगळता आलेख इतर प्रवाहातील कवितेपेक्षा घसरल्याचेच निरीक्षण या लेखात दिसते. आणखी एक मार्मिक निरीक्षण देशमुख यांनी या लेखात नोंदवले आहे ते असे की अनेक ग्रामीण कथा-कादंबरी आदी लेखनप्रकार सशक्त आहे, तितके काव्य-नाट्य प्रकार का नाही? त्याचेही कारण ही वरील ‘व्यासपीठे’च होत.
          अशी विपुल व्यासपीठे स्त्रीवादी कवितेला लाभली नाही. ती मंचीय व टाळी मिळवणारी नाही. त्यामुळे ती इतर साहित्यप्रवातील कवितेपेक्षा या दशकात अधिक सशक्त झाल्याचे निरीक्षण डॉ. नीलिमा गुंडी यांनी नोंदवले आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही कविता तिच्या स्त्रीवादी तत्त्वज्ञानाशी एकनिष्ठ आहे. स्त्रीच्या जगण्याचा शोध, विद्रोह, स्त्री-पुरुष नातेसंबंधांच्या प्रचलित कल्पना नाकारणे, पुरुषसत्ताक व समाजाचे पुरुषप्रधान डावपेच या विरुद्ध ती बोलते आहे आणि परिवर्तनाचा दृढ निर्धार ती व्यक्त करते आहे. ही वैशिष्ट्ये डॉ. गुंडी यांनी नोंदवली आहेत.
          स्त्रीवादी अभ्यासक एलेन शो-वॉल्टरने सांगितलेले खास स्त्री-अनुभवाचे क्षेत्र म्हणजे ‘वाइल्ड झोन’ या कवितेत गुंडी यांना दिसते. ऋतूप्राप्ती, स्त्रीच्या शारीरिक, मानसिक अवस्था, गर्भधारणेचा अनुभव, अपत्य संगोपनातील स्तनपानाचा शारीरिक व मानसिक देवाणघेवाणीचा अनुभव असे स्त्रियांच्या अनुभवसृष्टीचे शरीरनिष्ठ वैविध्य, हे ते ‘वाइल्ड झोन’ असून ते कवितेत प्रकटल्याने ही कविता इतर साहित्यप्रवाहातील कवितेपेक्षा अनन्य ठरली आहे. 
          ही कविता काव्य, साहित्य, धर्म व संस्कृतीशी असलेले नाते तपासते. सांकेतिक अभिरुचीच्या मर्यादा ओलांडते. पुराकथांना नवा अर्थ देते. लिंगभावाधारित विषमता दूर करू इच्छिते. आपल्या सहसंवेदनेने ती अधिक समाजाभिमुख होते आणि बलात्कार, हिंसा, दंगली, चंगळवाद, स्त्रीचे वस्तूकरण, स्त्रीभृण हत्या, पर्यावरणविनाश अशा संवेदनशील सामाजिक समस्येवर बोलत राहते.
          स्त्रीच्या जगण्यातच असलेल्या हा सहानुभाव आणि इतरांना आपल्या पोटात वाढू देण्याची जैविक व मानसिक क्षमता ही तिला स्व:पासून समष्टीपर्यंत नेते, तेही प्रचारी व बोधपर नव्हे तर आंतरिकतेने. ही आंतरिकता आपल्याला ग्रामीण कवितेत तर दिसत नाहीच; पण इतर समूहनिष्ठा मानणाऱ्या काव्यापेक्षा स्त्रीवादी काव्यात अधिक दिसते. तात्पर्य स्त्रीवादी कविता आधुनिक व साठोत्तरी काळापेक्षा या काळात अधिक समृद्ध झाल्याचे दिसते.
          याच सामाजिक भूमिकेतून व्यक्त होणारी कविता म्हणजे आदिवासी कविता होय. डॉ. विनोद कुमरे यांनी या कवितांतील आशयसूत्रांचा शोध घेतला आहे. आदिवासी कवितेत आतले आणि बाहेरचे असे दु:खाचे दोन स्तर प्रकटतात. त्यातून आदिवासींचा अजून स्वत:शी असलेला संघर्षही अजून संपला नाही हे अधोरेखित होते. बाहेरच्या लोकांनी केलेली लुडबुड, सुधारणा व विकासाच्या नावाखाली आदिवासींचे केलेले शोषण हा बाहेरचा; तर अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, कुपोषण असा हा आंतरिक संघर्ष आहे. आदिवासी जीवन चित्र-शिल्पकलेत मोठ्या प्रमाणात आले, मात्र त्यांचे वास्तविक जीवन आले नाही अशी खंत व्यक्त केली आहे.
          सहा हजार आदिवासींचे एक मंत्र्याने घडवलेलेले झारखंडमधील हत्याकांड, ओरिसाच्या कलिंगानगरात एका नामांकित उद्योगसमूहानेच केलेली तेरा आदिवासींची हत्या किंवा नक्षलवाद्यांच्या बिमोड या नावाखाली आदिवासींचे रोज होणारे मृत्यू- ही हिंसा- क्रौर्य पाहून थेट लोकशाहीबद्दलच ही कविता प्रश्न विचारते आहे.
          आदिवासी समाजात स्त्रीला कुटुंबप्रमुख ते जोडीदार निवडण्याचे व लैंगिकतेचे स्वातंत्र्य या स्त्रीला होते; मात्र आधुनिक जगाशी आलेल्या संपर्कामुळे याही समाजात पुरुषप्रधानता येऊन स्त्रीला गौण स्थान प्राप्त झाले. जोडीला अज्ञान व अंधश्रध्दा यामुळे होणारे अत्याचार, याविरुद्धचा उद्गारही आदिवासी कवितेत येतो. स्वातंत्र्यसाठी इतर मानवी समूह भविष्याकडे व बाह्य तत्त्वज्ञानाकडे आशेने पाहत असताना आदिवासी मात्र भूतकाळातील त्यांनी उपभोगलेल्या सामाजिक, राजकीय व आर्थिक स्वातंत्र्याकडे तोंड वळवतो आहे. कारण त्याचा भूतकाळ अधिक वैभवी आहे. या वैभवामुळे व इतिहासातील त्याने दिलेल्या लढ्यामुळेच त्याची प्रेरणा भूतकाळ आहे. हे नवेच निरीक्षण समोर येते. या दृष्टीने त्यांनी ‘रानआसवांचे तळे’या कवितेकडे लक्ष वेधले आहे.
          विशेष म्हणजे मुक्ती व स्वातंत्र्यासाठी जात हा अडसर आहे हे भानही या कवितेत असून कवीच आता लोकांचे प्रतिनिधित्व करू पाहतो, ही गोष्टही खूप आश्वासक आहे. आपण आणि समाज यांचे चिंतन करणारी आदिवासी कविता पर्यावरण ऱ्हासाबद्दल, जंगलतोडीबद्दल बोलत आहे. आधुनिक शहरी समाज बौद्धिक जाणिवेने पर्यावरणाशी बांधिलकी जोपासतो. आदिवासी मात्र जंगल, तिच्याशी निगडित अशा संस्कृती व जीवन याचा आंतरिक वेध घेत जातो. आदिवासी कविता व्यापारीकरण, व्यवस्थेने लावलेले सांस्कृतिक निकष या विरुद्ध बोलते आहे.  
          तात्पर्य इतर सर्व साहित्यप्रवाहापेक्षा आदिवासी समाजाचे जीवन व संस्कृती भिन्न असल्याने या कवितेचे व आशयाचे स्वरूपही भिन्न आहे. म्हणूनच कुमरे यांच्या मते, प्रचलित समीक्षा-सौंदर्याचे निकष तिला लावता येणार नाही. आपले सौंदर्यशास्त्र संस्कृत साहित्याचे असल्याने आणि त्या साहित्याने आदिवासींना विकृत, हीन, राक्षस असे हिणवल्याने, आदिवासी सौंदर्यशास्त्राची गरज बोलून दाखवली आहे. मात्र आदिवासी कविता संख्यात्मकतेने जशी वाढली तशी गुणात्मकतेने वाढली नाही, अशी खंत व्यक्त करून कुमरे यांनी त्यासाठी आदिवासी जीवनाच्या खास वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करावयास हवे असे म्हटले आहे.
          कुमरे म्हणतात, जगातील सर्व धर्म, संस्कृती, कलात्मकता, भाषा, लिपी आणि तंत्रज्ञान यांचा स्त्रोत, अलिखित ज्ञानव्यवस्था ज्या आदिवासी संस्कृतीत आहे, त्यावर भर देण्याची गरज आहे. एकूणच काव्याच्या इतर प्रवाहापेक्षा वेगळ्या पद्धतीचे स्वरूप असलेल्या या साहित्य प्रवाहाची व कवितेची अधिक नोंद पुढील अभ्यासकांनी व विद्यापीठाने विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
          डॉ. भूषण रामटेके यांनी आंबेडकरी साहित्य तत्त्वज्ञानाचा पूर्वपक्ष मांडून नव्वदोत्तरी कवितेचे स्वरूप सांगितले आहे. नव्वदनंतर दलितांवरील अत्याचारात अधिक वाढ झाली. धर्म व जात यांचे अधिक प्राबल्य वाढले. अल्पसंख्यांक-बहुसंख्यांक हा वाद विकोपाला गेला. या सामाजिक वास्तवाची नोंद समता व बंधुता, लोकशाही मानणाऱ्या आंबेडकरवादी कवितेने अधिक केली आहे, याकडे लक्ष वेधले आहे. विशेष म्हणजे एकीकडे आशयाच्या बाबतीत अत्यंत समकालीन असणाऱ्या या कवितेत गुणवत्तेच्या बाबतीत घसरण झाल्याचे व त्याला प्रकाशनाच्या सुलभ परिस्थिती जबाबदार असल्याचे म्हटले आहे.     
          आजची आंबेडकरवादी कविता जागतिकीकरणाच्या व प्रस्थापितांच्या व्यवस्थेने निर्माण केलेल्या प्रश्नांना पारंपरिक प्रतिमा- प्रतीकांनी सामोरे जाते; ही कविता अजूनही पहिल्या आंबेडकरवादी कवितेच्या प्रभावातून अजून मुक्त झाली नाही, याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नव्वदोत्तरी कविता अधिक व्यापक, व्यामिश्र झाली नाही तर नष्ट झालेली मार्क्सवादी कविता व कोशातच अडकलेल्या ग्रामीण कवितेसारखी तिची अवस्था होईल, असे म्हटले आहे. इतर प्रवाहातील कविता आवर्तात अडकलेली असल्यामुळेच या कवितेची जबाबदारी अधिक वाढली आहे. ग्रामीण कवितेला फुले-आंबेडकरवादी विचारांपर्यंत आल्याशिवाय व आदिवासी- स्त्रीवादी कवितेला फुले-आंबेडकरवाद नाकारून पुढे जाता येत नाही असे म्हणत, सर्वच साहित्यप्रवाहांच्या विकासासाठी  या तत्वज्ञानाची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
          या विशेषांकात पृष्ठसंख्या व पुरेशा वेळेअभावी मुस्लीम, ख्रिश्चन आदी साहित्यप्रवाहातील कविता नोंदवता आली नाही याचा खेद वाटतो. ती उणीव या लेखसंग्रहाचा ग्रंथ करताना भरून काढता येईल. डॉ. अक्रम पठाण या तरुण अभ्यासकाने आपल्या, ‘मुस्लीम मराठी साहित्य’ या ग्रंथात मुस्लीम कवितेबद्दल लिहिले असून त्यात समकालीन मराठी कविता, सांस्कृतिक वास्तव, या कवितेतील वेदना, विद्रोह, प्रकटणारे ताण या आशयसूत्रांचा विचार केला आहे. डॉ. अजीज नदाफ, फ. म. शहजिंदे, बडीउज्ज्मान खावर, ए. के. शेख, खलील मोमीन, इलाही जमादार, इतबार पठाण, इब्राहिम खान, जावेद कुरेशी, नसीमा पठाण, जुल्फी शेख, फातिमा मुजावर, मुबारक शेख, एहतेशाम देशमुख, शेख इक्बाल मिन्ने, अमन तांबोळी, मिर्झा रफी अहमद बेग, शबीर मुलांनी, इक्बाल मुकादम, शफिक शेख, दि. के. शेख, सय्यद अल्लाउद्दिन, ए. एस. पठाण, अजीम नवाझ राही, शफी बोलडेकर या मुस्लीम कवींच्या कवितांबद्दल लिहिले आहे. त्यातून नव्वदोत्तरी समस्यांना सामोरे जाणारी कविता दिसून येते.
          समकालाची समग्र नोंद घेणाऱ्या सर्व नव्वदोत्तरी कवींचे व याचे साकल्याने विश्लेषण करणाऱ्या लेखकांचे व संपादक ढाणके यांचे मनापासून आभार.
अभ्यास साधने
·    कुलकर्णी, द. भि., १९९३ :  दोन परंपरा, नागपूर, विजय प्रकाशन  
·       पठाण अक्रम, २०१४ : मुस्लीम मराठी साहित्य, नागपूर, युगसाक्षी प्रकाशन 
·       धोंगडे अश्विनी, स्त्रीवादी साहित्य : स्वरूप आणि संदर्भ, पुणे, विद्या प्रकाशन
·       डहाके वसंत आबाजी, गणोरकर प्रभा, २००१: संज्ञा –संकल्पना कोश, मुंबई, ग. रा. भटकळ फौंडेशन
·    मालशे मिलिंद/ अशोक जोशी, २००७ : आधुनिक समीक्षा सिद्धांत, मौज प्रकाशन मुंबई,  
·    मुक्तिबोध शरश्चंद्र, नवी मळवाट (दु. आ.), मुंबई, मौज प्रकाशन गृह
§  लेख 
  •   जावरे अनिके, २०००, ए-मे-जून: साहित्य उत्तर आधुनिकतावाद, एक संक्षिप्त परिचय, औरंगाबाद, अभिव्यक्ती 
  •   जोशी, अ. कृ., २००५, फेब्रु : उत्तर आधुनिकतावाद, वाई, नवभारत नवभारत रंगराव, बी., २०१३, ऑनोडि
  •   रंगराव, बी. २००८, ऑनोडि, २००८, : विद्रोही साहित्याचे उत्तर आधुनिक संदर्भ, अमरावती, सर्वधारा 
  •   रंगराव, बी., २०१३, ऑनोडि : आधुनिकता/ उत्तर आधुनिकता, अमरावती, सर्वधारा 
  •       रंगराव, बी., २०१३, वार्षिक विशेषांक, दलित साहित्याची उत्तर आधुनिक मीमांसा औरंगाबाद, अस्मितादर्श 
  •        डहाके, वसंत आबाजी, २०००,ए-मे-जून : उत्तर आधुनिकतावाद आणि उत्तरवसाहतवाद, औरंगाबाद, अभिव्यक्ती
  •       दा. गो. काळे, (संपा) ऑगस्ट,२०१४ : दलित कविता विशेषांक, बुलढाणा, अतिरिक्त

----------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी : 
- सर्वधारा | जाने-फेब्रु-मार्च | २०१७
- कवितेचा अंत:स्वर, डॉ. देवानंद सोनटक्के, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २०१८ 


Tuesday, May 5, 2020

शरश्चंद्र मुक्तिबोधांचा लौकिकतावादी साहित्यविचार



शरश्चंद्र मुक्तिबोध हे मराठीतील नवकवी व कादंबरीकर असून समीक्षेच्या क्षेत्रातही त्यांनी मोलाचे कार्य केले आहे. ‘काही निबंध’ (१९६३), ‘जीवन आणि साहित्य’ (१९७२) आणि ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’(१९७८) हे त्यांचे समीक्षाग्रंथ प्रसिद्ध आहेत. यातून त्यांची प्रतिभावंत साहित्यचिंतक  अशी ओळख आपल्या समोर येते. 

----------------------------------------------------
शरश्चंद्र मुक्तिबोधांसारख्या तत्त्वचिंतक प्रतिभावंताचा साहित्यविचार त्यांच्या ‘सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’ या ग्रंथामधून प्राधान्याने समोर येतो. या ग्रंथात त्यांनी ‘रससिद्धांत’ (अभिनवगुप्त) आणि ‘लयसिद्धांत’ (मर्ढेकर) या सिद्धांताची परखड चिकित्सा करून आपला ‘मानुषतेचा सिद्धांत’ मांडला आहे. साहित्यकृतीचा निकष म्हणून या दोन्ही सिद्धांतावर टीकाही केली आहे. हे करताना त्यांनी त्यातील काही परिभाषा मान्य केली आहे आणि काही भाग आत्मसातही केला आहे.
रससिद्धांतावरील आक्षेप
             ‘रससिद्धांत’ हा इ. स. पूर्व दुसऱ्या शतकात भरतमुनीने त्याच्या ‘नाट्यशास्त्र’ या ग्रंथात नाट्यप्रकारासंदर्भात प्रथम मांडला असून पुढे इ. स. च्या ११ व्या शतकात अभिनवगुप्ताने तो नाट्याखेरीज काव्यप्रकारालाही लावून दाखविला आहे.
या सिद्धांतावर दि. के. बेडेकर तसेच गंगाधर गाडगीळ यांसारख्या आधुनिक अभ्यासकांनी या पूर्वीही आक्षेप घेतले आहेत. मुक्तिबोधांनी मात्र नुसते आक्षेप न घेता त्यासाठी पर्यायी असा ‘मानुषतेचा सिद्धांत’ही सांगितला आहे. मुक्तिबोधांचे या रससिद्धांतावरील आक्षेप पाहण्याआधी रससिद्धांताचे थोडक्यात स्वरूप पाहू.
रससिद्धांत हा निर्मितिप्रक्रिया व आस्वादप्रक्रिया यांचे स्वरूप स्पष्ट करणारा सिद्धांत आहे. ‘साधारणीकरण’ हा त्याचा आधार आहे. या सिद्धांतानुसार, निर्माता, साहित्यकृती व आस्वादक-रसिक या तिघांचेही जेव्हा ‘साधारणीकरण’ म्हणजे सामान्यीकरण होते; म्हणजे हे तिघेही लौकिकभिन्न पातळीवर येतात, तेव्हाच रसप्रक्रिया शुद्ध स्वरूपात प्रकटते. ही लौकिकभिन्न पातळी म्हणजे कलावंत व रसिक दोघेही आप-पर-तटस्थभावातून मुक्त होऊन, साहित्यकृतीच्या आस्वाद-जातिरूप अशा पातळीवर येतात, ती होय. तिलाच ‘साधारणीकरण’ अशी संज्ञा आहे. साहित्यकृतीच्या आशयाचे साधारणीकरण होत असते, म्हणजे लौकिकपातळीवरून आस्वादाच्या  लौकिकभिन्न पातळीवर जातानाही  आशय मात्र मूल्यरहित होत नाही; तर तो मूल्यभावासह प्रकटत असतो; आणि ही मूल्ये कोणती याचा विचारही भारतीय साहित्यशास्त्राने केला आहे.
भारतीय साहित्यशास्त्रानुसार ही मूल्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष ही होत. यालाच चार ‘पुरुषार्थ’ असे म्हणतात. साहित्याच्या या मूल्यनिष्ठेलाच ‘पुरुषार्थनिष्ठा’ किंवा ‘पुमर्थनिष्ठा’ असे नाव आहे. मुळात ही मूल्ये म्हणजे त्या त्या समाजाचे त्या त्या काळातील मानदंड होते, जे आज चुकीचेच आहे. पण त्यांचा मूल्यांचा आग्रह मात्र साहित्यातून धरला गेला. रससिद्धांतात याच मूल्यभावाचा आग्रह धरला आहे. त्यानुसारच रसाची विभागणी झाल्याचे दिसते. म्हणजे या मूल्यांच्या बाजूचे ते नायक-देव व विरुद्ध बाजूचे ते प्रतिनायक-दानव. म्हणून पहिले चार रस - वीर, हास्य, शृंगार, अद्भूत हे नायकगत, म्हणजे देवांचे; तर करुण, बीभत्स, रौद्र, भयानक हे रस प्रतिनायकगत, म्हणजे दानवांचे ठरले आहेत.
अशा मूल्याग्रह व रसविभागणीमुळेच मुक्तिबोधांनी रससिद्धांतावर आक्षेप घेतले आहेत. मुक्तिबोधांच्या मते, आर्ष महाकाव्ये, प्राचीन ग्रीक महाकाव्ये, आधुनिक साहित्य यांना हे रसतत्त्व लागू होत नाही. कारण रस ही अनुभवसिद्ध गोष्ट आहे, असे जरी भारतीय साहित्यशास्त्र म्हणत असले तरी, आजच्या रसिकाला ती प्रतीती येत नाही.
मुक्तिबोधांच्या मते, आजचे श्रेष्ठ साहित्य मानवी जीवनाच्या वेगळ्या, व्यापक, विशाल अनुभवाची प्रतीती देते. मानवाच्या आशा, आकांक्षा, त्याचे हेतू, त्याच्या प्रेरणा याचे वेगळेच दर्शन घडवते; रसाची प्रतीती देत नाही. त्यामुळे आजच्या श्रेष्ठ कलाकृती, मानवी जीवनाचे गतिशील रूप, त्याच्या ज्ञात-अज्ञात नियती, स्थिती-गतीचे चित्रण करीत असते. त्याला रसाची परिभाषा वापरून न्याय देता येत नाही. ललितकृतीच्या लेखकाने विभावादींच्या प्रभावी चित्रणाबरोबरच श्रेष्ठ अजूनही काही विशेष दाखविलेले असते. अशा ललितकृतीच्या अनुभवांना ‘रसानुभव’ हे नाव देता येत नाही, असे मुक्तिबोधांचे म्हणणे आहे.
भारतीय साहित्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. ग. त्र्यं. देशपांडे यांनी त्यांच्या ‘भारतीय साहित्यशास्त्र’ या ग्रंथात म्हटले आहे की, ‘कवीने नाट्यात वा काव्यात कोणतीही कृती वर्णावयास घेतली तरी ती पुरुषार्थनिष्ठ असल्याशिवाय तिला अर्थपूर्णताही येत नाही आणि ती आस्वाद्यही होत नाही’.
मुक्तिबोधांनी या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेतले आहेत. त्यांच्या मते, भारतीय साहित्यशास्त्रानुसार, विदग्ध कलाकृतीचे नायक या पुमर्थनिष्ठेनुसार अनुकूल व प्रतिनायक प्रतिकूल वागतात. म्हणजे नायकगत व प्रतिनायकगत रस ठरलेले आहेत. याचा अर्थ कलाकृतीच्या आकलनाचे असे सामान्य नियम ठरून गेले आहेत.
मुक्तिबोधांच्या मते, या सिद्धांतानुसार आदर्श नायकाची कल्पना समाजसापेक्ष आहे. उदा. दुष्यंत हा आदर्श नायक, पुमर्थनिष्ठा पाळणारा. शिवाय हे आदर्श समाजाने घालून दिलेले आणि नाटककाराने मुकाट्याने मान्य केलेले. म्हणजे ते वर्गसापेक्ष आणि कालसापेक्ष आहेत. ही रसशास्त्राची मूल्यनिष्ठाच चुकीची व कालबाह्य आहे.
मुक्तिबोधांचा आक्षेप असा की, रससिद्धांतानुसार विभावानुभवांना एक साहित्यशास्त्रीय म्हणजे जातिरूप पातळीवर; आणि दुसरे समाजशास्त्रीय म्हणजे पुमर्थनिष्ठेला संवादी राहणे, अशी कामे करावी लागतात. परिणामी साहित्यशास्त्र केवळ उच्चवर्णीय व उच्चवर्गीय विचारांचेच आदर्श नाटकात आणते. त्यामुळे कलावंतांचे स्वातंत्र्य बाधित होते. त्याला केवळ भाषा-अलंकार व भावदर्शन यांच्यापुरतेच स्वातंत्र्य मिळते. या बंधनामुळे नायक-नायिका संकल्पनेत कोणत्याही क्रांतिकारी बदलाची अपेक्षा नष्ट होते. मुक्तिबोध म्हणतात, भारतीय साहित्यशास्त्राने कलावंतासमोर  समाजाची  परंपरागत मूल्ये कायम ठेवणारा आदर्श ठेवला व रसानुभव त्यावर अवलंबून ठेवला. परिणामी संस्कृत कवीची दृष्टी पुमर्थनिष्ठेला मानणारी ठरली. यामुळे स्वतंत्र निरीक्षण, स्वतंत्र मूल्यभाव, संघर्ष, रूढ न्याय व खरा मानवी न्याय यातील अंतर जाणवणे, ते प्रकट करणे, या गोष्टी कलावंतासमोर आल्या नाहीत. हे प्राचीन लेखक अभिजातवादी होते. त्यांना पुमर्थनिष्ठेचे बाळकडू मिळाले. तसेच रसानुभव ब्रह्मास्वाद असल्याने त्यांना अध्यात्मवादी तत्त्वज्ञानही मान्य करावे लागले.
तात्पर्य, मुक्तिबोधांच्या रससिद्धांताबद्दलचे एकूण निष्कर्ष असे की, संस्कृत काव्ये आणि त्याच्या पठडीतली काव्ये सोडली तर इतर ललित वाङ्मयाला हे तत्त्व लागू पडत नाही. आजच्या रसिकाला रसाची प्रतीती येत नाही. रससिद्धांतामुळे आधुनिक ललितकृतीच्या वैशिष्ट्यांवर प्रकाश पडत नाही. रसास्वाद हा ब्रह्मास्वाद सहोदर मानल्यामुळे आध्यात्मिक तत्त्वज्ञान व पुरुषार्थनिष्ठा स्वीकारूनच रसतत्त्व स्वीकारावे लागते. त्यामुळे आजच्या साहित्याच्या संदर्भात रसतत्त्व स्वीकारता येत नाही.
म्हणूनच रसाला ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येत नाही.
लयसिद्धांतावरील आक्षेप
            रसाला ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येत नाही, या निष्कर्षापर्यंत मुक्तिबोध आले आहेत. मात्र आधुनिक काळातील बा. सी. मर्ढेकरांनी प्रतिपादलेल्या लयतत्त्वाला ललितकृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येते काय, याचीही सविस्तर चर्चा मुक्तिबोध करतात. ती समजून घेण्याआधी मुळात लयतत्त्वकिंवा लयसिद्धांतकाय आहे, ते समजून घेऊ. 
मर्ढेकरांचे लयतत्त्व
लयतत्त्वकिंवा लयसिद्धांतहा प्रसिद्ध कवी व सौंदर्यशास्त्रज्ञ  बा. सी. मर्ढेकर यांनी मांडलेला सौंदर्यसिद्धांत होय. मर्ढेकरांच्या सिद्धांतानुसार, कलाकृती ही अनुभवनिष्ठ घटकांची सौंदर्यनिष्ठ संघटना असते. तिच्यातील घटक परस्परांशी सौंदर्यतत्त्वाच्या अपरिहार्यतेने निगडित झालेले असतात. हे सौंदर्यतत्त्व म्हणजे लयतत्त्व असून; लयतत्त्व म्हणजे, अनुभवातील सौंदर्यनिष्ठ संघटनेतील संवाद-विरोध-समतोल यांचे तत्त्व होय. शब्दांव्दारे साकारलेल्या भावार्थाची लयनिष्ठ रचना म्हणजे ललितकृती होय.
मर्ढेकरांच्या मते, ललितकृती कोणतीही असो, तिचे व्यवच्छेदक तत्त्व लयतत्त्व असते. प्रत्येक ललितकृतीला एक घाट असतो, जो सुंदर असतो, कारण तो लयनिष्ठ असतो. मात्र सौंदर्यभावना ज्यांच्या जवळ असते; तेच या ललितकृतीचा, सौंदर्याचा आस्वाद घेऊ शकतो. या ललित वाङ्मयाचे साधन भाषा असते. तिच्या आधारेच भावार्थ अनुभव साकार होतात. त्याला भावार्थ म्हणतात. या भावार्थाचे कलाकृतीतील साकार घटक हेच ललितकृतीचे माध्यम होय; आणि भावार्थाच्या घटकांची संवाद-विरोध-समतोल या तत्त्वांनी रचना केली की, ती वाङ्मयीन कृती होते. म्हणजे भाषा-अनुभव-भावार्थ-मध्यम असा हा क्रम असून लयतत्त्व हे त्या रचनेचे तत्त्व आहे. म्हणून ते वस्तुनिष्ठ तत्त्व आहे. हेच लयतत्त्व ललित ललित वाङ्मयाला लागू होते.
लयतत्त्वाबद्दल मर्ढेकरांनी एक उदाहरण दिले आहे. एक भिकारी रस्त्यावर कण्हत आहे. एक श्रीमंत माणूस त्याकडे कानाडोळा करतो आहे, तर एक गरीब माणूस त्याला मदत करतो आहे आणि हे दृश्य एक तिऱ्हाईत पाहतो आहे. मर्ढेकरांच्या मते, हे दृश्य पाहून त्यात तिऱ्हाईताने तर्कसंगती लावण्याचा प्रयत्न केल्यास जीवशास्त्रीय भावना (लौकिक राग, लोभ आदी) निर्माण होतात; तर त्या अर्थपूर्ण वागणुकीतील विरोधलय पहिल्यास सौंदर्यभावना निर्माण होईल. अशा सौंदर्यभावनांची म्हणजे भावार्थाच्या घटकांची संवाद-विरोध-समतोल या तत्त्वांनी रचना केली की, ती वाङ्मयीन सौंदर्याकृती होते.
तात्पर्य, जीवनानुभवाची तर्कसंगती लावणे म्हणजे जीवशास्त्रीय भावना व लौकिक जीवनानुभव होय, तर जीवनानुभवाची सौंदर्यसंगती लावणे म्हणजे सौंदर्यशास्त्रीय भावना व अलौकिक कलानुभव होय. इथे मर्ढेकर कलानिर्मित्ती व आस्वाद ही अलौकिक गोष्ट मानतात; तर मुक्तिबोध लौकिक.
            लयतत्त्वावरील मुक्तिबोधाचे आक्षेप
            मर्ढेकरांनी दिलेल्या या उदाहरणावर मुक्तिबोधांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, ज्याप्रमाणे काळा व पांढरा यांत मधील विरोध जसा ठळक जाणवतो, तसा अशा अनुभवात जाणवत नसतो. उदा. लांडग्याच्या कळपातून सुटून आलेला मुलगा, आदिवासी जमातीतून नुकताच आलेला किंवा बंगालच्या फैटणवाला अशा तिन्ही वेगवेगळ्या वर्गातील माणसांना त्या भिकाऱ्याच्या दृश्यातील विरोधसंबंध जाणवणार नाही. कारण, अर्थातील विरोध संबंध जाणवण्यासाठी तिऱ्हाईत हा वर्गीय संबंधातीलच हवा. म्हणजे तिऱ्हाइताच्या जाणिवासुद्धा वर्गीय असतात, लौकिक असतात, असे त्यांना म्हणावयाचे आहे. मार्धेकारणी मात्र तिऱ्हाईत हा कवी-सौंदर्यभावना संपन्न मनाला आहे.  मुक्तिबोधांच्या मते, व्यवहारात अनुभव असा तटस्थतेच्या पातळीवर येत नाही आणि मर्ढेकरांची सक्त ताकीद अशी की, तिऱ्हाईताने तर्कसंगती लावू नये, गरिबाबद्दल दया किंवा श्रीमंतांबद्दल तिरस्कार वाटू देऊ नये, हे शक्य नसते. इथे मुक्तिबोध कलास्वाद ही लौकिक व्यावहारिक गोष्ट आहे असे मानत आहेत. कारण ते स्वत: लौकिकतावादी आहेत.
            मुक्तिबोधांचा आक्षेप असा की, मर्ढेकरांना व्यावहारिक अनुभव व कलात्म अनुभव यातील नेमका भेद माहित नाही. सौंदर्य हे रचनेत असते, आशयात नसते असे त्यांचे म्हणणे असल्यामुळे त्यांनी या अनुभव भेदाकडे लक्ष दिले नाही.  ते राग, लोभ या भावना येऊ न देता ते तिऱ्हाईतपणे नुसती भावनासंगती लावावी, अर्थ नव्हे असे म्हणतात. पण मुळात ललितकृतीच्या घटकातच मूल्यात्म संघर्ष असतो, याकडे त्यांनी लक्ष दिले नाही. 
            ललितकृतीच्या घटकातच मूल्यात्म संघर्ष 
          ललितकृतीच्या घटकात मुळातच मूल्यात्म संघर्ष असतो, या गृहितकाच्या आधारे मुक्तिबोध मर्ढेकरांच्या उदाहरणाचे विश्लेषण करतात. त्यांच्या मते, भिकाऱ्याच्या उदाहरणात, श्रीमंताच्या कृतीत भौतिक संपन्नता व नैतिक विपन्नता आहे, तर गरिबाच्या कृतीत नैतिक संपन्नता व भौतिक विपन्नता आहे. हा विरोध संबंध आहे. तो नुसता सौंदर्यात्म भावनायुक्त नाही, तर अर्थपूर्ण घटकातील आहे. तसेच तो काळ्या पांढऱ्या रंगातील आपोआप जाणवणाऱ्या विरोधासारखा नाही, तर मूल्यात्म आहे. त्यात भौतिक व नैतिक असे दोन परस्परविरोधी घटक आहेत. तात्पर्य, ललितकृतीतील घटकांमध्ये संवाद-विरोध संबंध निर्माण होतात, ते त्या मागील मूल्यात्म संघर्षामधूनच, नुसत्या विरोध लयातून नव्हे.
            मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांच्या मर्यादा
            पुढे मुक्तिबोधांनी लयसिद्धांताबरोबरच मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांच्याही मर्यादा सांगितल्या आहेत. त्यांच्या मते, मर्ढेकरांना ललित साहित्यातील भावना-आकृती भूमितीय स्वरूपाची म्हणजे आकारिक वाटते. ते चित्र आणि शिल्प यांच्या पातळीवर ललित साहित्याला आणून बसवतात. त्या कलांतील लयतत्त्वाला साहित्यकलेत महत्त्व देतात. ललित कलाकृतीचे घटक व त्यातील त्यांचे परस्पर संबंध यांचा ते यांत्रिकपणे विचार करतात, त्यातील मूल्यात्मक भावार्थाकडे लक्ष देत नाहीत.
             दुसरे असे की, मर्ढेकर भावनांचे सूक्ष्म घटक व त्यांचे सूक्ष्मतर परस्पर संबंध यांची विविध लयबद्धता फक्त कवीच्या-लेखकाच्या अनुभवातच साकार होते आणि भावनांच्या या लयबद्धतेची श्रेष्ठता त्यातील जाणिवांच्या व्यापकतेनेच प्रवर्तित केलेली असतात, असे मानतात. हेही मुक्तिबोधांना चुकीचे वाटते. कारण या भावनांच्या व भावनासंबंधांच्या सूक्ष्मतर स्वरूपाची प्रचिती मूल्यार्थ व्यापकतेनेच येते; नुसत्या संवेदनेने नाही. म्हणजे अधिकाधिक संवेदानांपेक्षा अधिकाधिक मूल्यार्थ याला मुक्तिबोध महत्त्वाचे मानतात. म्हणजे मुक्तिबोध अर्थाला तर मर्ढेकर सौंदर्यभावनेला महत्त्व देतात. मर्ढेकरांच्या वाङ्मयीन महात्मतेत लक्ष्य असलेला कैवल्यपूर्ण मूल्यभावम्हणजेच लयबद्धतेतून लक्ष्य होणारे सौंदर्य होय. मात्र या व्यापक जाणिवा किंवा अनुभव साफल्य मूल्यात्म असते, हे मर्ढेकर कबूल करत नाहीत, असा आक्षेप मुक्तिबोध घेतात.
            तिसरे म्हणजे, रसिकांनी लयबद्धतेचा आस्वाद घ्यावा, आशयाचा मूल्यात्म आस्वाद नको, हे जे मर्ढेकरांना अभिप्रेत आहे; जे मुळात साहित्यकलेत शक्य नसते. ते फक्त चित्रकलेतच शक्य असते. कारण चित्र-शिल्प यांत रूपरचनेचे चिंतन असते, तसे साहित्यकलेत शक्य नसते. मुक्तिबोधांच्या मते, तुकोबांच्या कवितेचा आस्वाद म्हणजे फक्त लयबद्धतेचा आस्वाद नव्हे. त्या कवितेचे आपण आकृतिबंध म्हणून चिंतन करीत नाही, भावार्थाचे, मूल्यार्थाचे करतो.
            मुक्तिबोध म्हणतात, साहित्याच्या निर्मिती व आस्वाद प्रक्रियेचा विचार केल्यास, संवाद-विरोध अनुभव घटकांच्या साह्याने जे भावार्थ प्रतीत होतात, त्यामागे एक व्यापक एकात्म जाणीव असते. कलाकृतीच्या संवाद- विरोधी घटकांच्या प्रत्ययामधून रसिकांना त्या एकात्म जाणिवेची प्रतीती येते. परंतु असा निष्कर्ष मर्ढेकर काढत नाहीत, ते संघटनेच्या म्हणजे रचनेच्या संदर्भातील घटकांच्या संवाद-विरोध-समतोलावरच भर देतात. ही मर्ढेकरांच्या सौंदर्यविचारांची मोठीच मर्यादा होय.  
ललित कला व ललित वाङ्मयात भेद
            मुक्तिबोधांच्या मते, मुळात इतर ललित कलेत लक्ष्य असलेला संवेदनानुभव आणि ललित वाङ्मयातील भावार्थाचे घटक यांच्यात गुणात्म भेद आहे. ललित कलांमध्ये विशुद्ध संवेदनांची संवाद-विरोधी रचना ही जशी संवाद-विरोध-समतोलावरच आपली चित्तवृत्ती खिळवून ठेऊ शकते, तसे साहित्यकृतीत भावार्थाच्या घटकांबाबत कधीच होत नाही. कारण ललित वाङ्मयाबाबत संवाद-विरोधी आकलन करणारी वाचकाची जी चित्तवृत्ती असते, ती या वाङ्मयातील संवाद-विरोधावरच स्थिर न राहता, वाचकाला तात्काळ एकात्म अर्थाची प्रतीती करून देत राहते. अशा संवाद-विरोधी संबंधांच्या अनेक स्तरावरील अनेक भावार्थव्यूहांच्या मागील एकार्थ आकलन करीत ती त्या अनेक एकार्थामधून ललित कलाकृतीतील जीवनसत्याचा साक्षात्कार करून देते.  म्हणजे साहित्यकृतीत अर्थ पातळीवरील संवाद-विरोध वाचकाला एकार्थ व त्या आधारे जीवनसत्य सांगतो, सौंदर्य नव्हे, असे मुक्तिबोधांना म्हणावयाचे आहे.
         तात्पर्य, मर्ढेकरांना साहित्यात प्रकटणाऱ्या जीवनानुभवाचा तर्कापलीकडील संवेदनात्मक संवाद-विरोध-समतोलयुक्त अनुभव अभिप्रेत आहे; तर मुक्तिबोधांना साहित्यात प्रकटणाऱ्या जीवनानुभवाचा तर्कसापेक्ष मूल्यार्थगर्भ अनुभव अभिप्रेत आहे. एक आकृतिसापेक्ष विचार आहे, दुसरा अर्थसापेक्षविचार आहे. मर्ढेकरांचा भर रचनातत्त्वववर आहे, मुक्तिबोधांचा आशयावर. मर्ढेकरांना अनुभवातील संवाद-विरोधी लयातील सौंदर्य महत्त्वाचे वाटते, तर मुक्तिबोधांना अनुभवातील संवाद-विरोधी लयातील सत्य महत्त्वाचे वाटते. एक भावना-संवेदनांच्या लयप्रतीतीला महत्त्व देतोय, तर दुसरा आशयातील मूल्यात्म अर्थाला. असे होण्याचे कारण मर्ढेकर हे निखळ सौंदर्यवादी-कलावादी होते; तर मुक्तिबोध हे जीवनवादी-लौकिकतावादी सौंदर्यमीमांसक आहेत. त्यामुळे दोघांच्या सौंदर्यविचारात मूल्यात्म भेद आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे.
            त्यामुळेच मुक्तिबोध म्हणतात, मर्ढेकरांनी, संवेदनानुभवाच्या घटकांची संघटना व त्यामधील परस्पर संबंधांचा अनुभव आणि भावार्थाची संघटना व त्यामधील परस्पर संबंधांचा अनुभव, यामधील गुणात्म भेद लक्षात न घेतल्यामुळे मर्ढेकरांचा सौंदर्यविचार चुकीच्या वळणावर गेला.
            लयसिद्धांत : वाङ्मयीन महात्मतेचा निकष नव्हे
            मर्ढेकरांनी वाङ्मयीन महात्मतेचा निकष लयहाच मानला आहे. त्यांच्या मते, लेखकाच्या अंत:करणातील भावना-सौंदर्याची संगती लेखकाच्या विश्वरचना सौंदर्याशी अधिकाधिक सम्यकतेने सांगड घालणे यातच महात्मतेचा प्रकर्ष आहे. यावरही मुक्तिबोधांनी आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, ‘विश्वरचना सौंदर्यहा शब्द वापरताना मर्ढेकरांनी हे विश्व एक आणि एकच वस्तू आहे, असे गृहीत धरले आहे, हेच चुकीचे आहे. कारण हे विश्व मानवाला संपूर्ण दिसू शकत नाही. त्यामुळे विश्वरचना सुंदर असल्याचे गृहीत धरणे चुकीचे आहे. विश्वाच्या रूपाची माहिती असल्याशिवाय भावनासंगतीमध्ये विश्वव्यवस्थेचे प्रतिबिंब पडले आहे, हे कसे कळणार?
            मर्ढेकर मानतात की, ज्या ललितकृतीत संवाद-विरोध-समतोलात्मक अशा लयनिष्ठ संबंधाचे अधिकाधिक घटक असतील ती श्रेष्ठ. मुक्तिबोधांच्या मते, हा निकषही गृहीत धरता येत नाही. कारण श्रेष्ठ वाङ्मय हे कमीत कमी घटकांचेही असू शकते. तेव्हा घटकांचा म्हणजे लयसंबंधांचा कमीजास्तपणा हा ललितकृतीच्या श्रेष्ठ-कनिष्ठतेचा निकष योग्य नाही.
            तात्पर्य, लयतत्त्व हा वाङ्मयीन महात्मतेचा निकष होऊ शकत नाही. मुळात लयतत्त्व ही कलेतील रचनेने निर्माण करावयाची गोष्ट नाही, तर लय ही मुळातच असते. कारण ते कलातत्त्वीय सत्य नसून निसर्गतत्त्वीय गोष्ट आहे. हे म्हणणे पटवून देण्यासाठी त्यांनी एंट्रोपीचा सिद्धांतसमजावून सांगितला आहे.
            एंट्रोपीचा सिद्धांत
            मुक्तिबोधांच्या मते, लयतत्त्व हे निसर्गशास्त्रीय तत्त्व आहे. लयतत्त्व ही ललित वाङ्मयाची अवश्योपाधी आहे. लयतत्त्व ही एक भाषिक संघटना आहे. तिथे रूपव्यवस्थिती आहे; आणि रूपव्यवस्थिती आहे, म्हणून तिथे समांगता’ (Symentry) आहे. ही गोष्ट पदार्थविज्ञान, गतिशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतिशास्त्र व मानसशास्त्र यांच्या आधारे सिद्ध करता येते. या सर्वांच्या मुळाशी एंट्रोपीचा सिद्धांतआहे.  
            या सिद्धांतानुसार, हे विश्व स्थिर नसून गतिमान आहे. ऊर्जा’ (Energy) नित्यनवी रूपे धारण करत असते व ते करताना अधिक वैविध्याकडे जाण्याची तिची प्रवृत्ती असते. गर्भित ऊर्जा’ (Potential Energy) ही किमान पातळीवर येऊनच आपला समतोल साधत असते; हा थर्मोडायनॉमिक्सचा पहिला नियम आहे. ही गर्भित ऊर्जा तिच्या सामर्थ्याच्या पातळीवर स्थिर रूप धारण करते व ते कमीत कमी जागेत द्रव्याच्या सर्वत्र समान वितरणामधून सिद्ध होते. रूपदृष्ट्या हीच समांगताहोय. 
            मुक्तिबोधांच्या मते, जगाच्या सर्व पातळ्यांवरील रूपपरिवर्तनात्मक गतिशीलताही एंट्रोपीच्या सिद्धांतानुसार असते; तर त्याची स्थितिशीलताही थर्मोडायनॉमिक्सचा पहिल्या नियमानुसार असते. या गोष्टी जैविकच आहेत. या नियमानुसार चित्रशिल्पादींची रूपव्यवस्थिती ही जैविक प्रक्रिया असून ती रूपविकास व्यापारातून सिद्ध झालेली असतात.
            हेच तत्त्व ते आता साहित्याच्या भाषेलाही लावून दाखवतात. मुक्तिबोध म्हणतात, भाषेची उच्चारशैली ही मानव निसर्ग यांच्या संघर्षातूनच निर्माण झाली आहे. तिच्यातील लयबद्धता ही प्रत्यक्ष कृतिसंबद्ध अवस्थेतील शरीर, म्हणजे श्वासोच्छवास, रक्ताभिसरण, हालचाल यांच्याशी संबंधित असते. कोण मला वठणीला आणू शकतो मी पाहे’, हा केशवसुतांचा काव्यातील उद्गार युद्धसज्ज प्रतिमेला सुचवतो.  कारण तो त्या अवस्थेतील शरीर मानस प्रक्रियांच्या विशिष्ट आरोह अवरोह प्रक्रियांचा व्यूह तयार करतो. उच्च्चारांची व हालचालींची लयबध्दता ही एखाद्या कृतीच्या सफलतेची अट असते. तात्पर्य, कलाकृतीतील लयबद्ध भाषिक आकृती ही सुद्धा शरीर मानस प्रक्रियातून आलेली स्वाभाविक लयबध्द भाषिक प्रक्रिया आहे. त्यामुळे भाषिक लय पण निर्माण करता येत नाही, तर ती आपोआपच निर्माण होत असते. असे त्यांना म्हणावयाचे आहे.
द्वंद्वात्मक मानवी जीवनातच संवाद- विरोध
            मुक्तिबोधांच्या मते, मानवी व अमानवी जीवन संघर्षरूप, द्वंद्वरूप आहे. त्यामुळे त्याचे शब्दरूप घटक हेही द्वंद्वरूपात्मक समतोल राखाणारे असते. त्यामुळे अशा जीवनाच्या शब्दरूप संघटनेमध्ये संवाद- विरोध-समतोलाचे तत्त्व निर्माण होणे स्वाभाविकच आहे. असा शब्दरूप अनुभव एक प्रकारे भाषिक सुरावलीच असते. या भाषिक सुरावलीत लयींची प्रतिमाव्यंजकता (क्षमता) व प्रतीकात्मकता असणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे अशा सुरावलीयुक्त भाषिक वृत्तीगर्भतेतून जे अनुभव साकार होतील तेव्हा आपोआपच लयतत्त्वाचे स्वरूप त्या संघटनेला प्राप्त होईल. म्हणजे भाषिक सुरावलीमुळे साहित्यकृतीत आपोआपच लयतत्त्व प्राप्त होत असते. त्यासाठी मुद्दाम लेखकाला काही करावे लागत नाही. अशा तऱ्हेने साहित्यकृतीतील भाषिक लय सेंद्रिय गोष्ट असते, असे मुक्तिबोध मानतात. मात्र मुळात मर्ढेकरांना लय भाषिक नव्हे तर, अनुभव व संवेदना-भावना यांत अभिप्रेत आहे, याकडे मुक्तिबोधांचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते.
            मुक्तिबोधांच्या म्हणण्यानुसार, व्यवहारातील अनुकूल-प्रतिकूल वृत्ती प्रकट करणाऱ्या साहित्याच्या व्यवस्थेतून  ललित लेखक जो एकार्थाचा प्रत्यय देतो; तो एकार्थच ललितकृतीमध्ये संवाद-विरोधी अनुभवाचे घटक एकत्र करून प्रकटतो. अशाप्रकारे ललितकृती एक चांगली भाषिक संघटना असते. त्यामुळे ती एका बाजूला एकार्थ प्रकट करते. दुसरीकडे संवाद विरोध समतोल ही रचनामूल्ये प्रकट करते.
            मुक्तिबोध म्हणतात, मर्ढेकरांनी लयबध्दता ही ललित वाङ्मयीन कलाकृतीची अपरिहार्य उपाधी मानली आहे.  मात्र ती संपूर्ण निसर्गाच्या रूपायन प्रक्रियेचाच तो विशिष्ट स्तरांवरील अविष्कार असतो. म्हणूनच लयतत्त्व हे निसर्गशास्त्रीय तत्त्व असून ते कलाशास्त्रीय तत्त्व नाही. ललितकलाकृतीचा आस्वाद म्हणजे लयतत्त्वाचा आस्वाद नव्हे तर ते एक सखोल साक्षात्कारी रूप असते. ते रूप म्हणजे त्या अनुभवाचेच स्वरूप असते. मर्ढेकर चित्र-शिल्पादी संवाद-विरोधी संबंधांचा अनुभव व ललित कलाकृतीतील घटकांचा संवाद-विरोधी-समतोलाचा अनुभव यातील मूल्यात्म भेद पाहू शकले नाही. त्यामुळे त्यांनी लयतत्त्व हे वाङ्मयीनकृतीचे सौंदर्यतत्त्व मानले. तथापि, ललित वाङ्मयीन कलाकृतीत एकार्थ-प्रतीतीलाच महत्त्व असते. पर्यायाने लयतत्त्वाला ललित वाङ्मयीन कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून मान्यता देता येत नाही.
मानुषतेचा सिद्धांत  
            मुक्तिबोधांनी अशाप्रकारे रससिद्धांत व लय सिद्धांत हे ललित वाङ्मयीन कृतीचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून नाकारल्यानंतर त्याला पर्यायी असे मानुषताहे सौंदर्यतत्त्व सांगितले आहे. मानुषताम्हटल्यावर कुणाच्याही मनात माणुसकीआणि मानवताअसे अर्थ जागे होतात. परंतु हे अर्थ मुक्तिबोधांना अभिप्रेत नाहीत. मुक्तिबोधांनी केलेल्या विवेचनाचा सारभूत अर्थ असा आहे:
            मुक्तिबोधांच्या मते, मनुष्य हा इतर पशुपक्ष्यांप्रमाणे एक नैसर्गिक प्राणी आहे. परंतु, मानवेतर प्राण्यांप्रमाणे त्याचे जीवन निव्वळ निसर्गस्तरीय नाही. निसर्गाशी संघर्ष करूनच त्याने विवाहसंस्था, कुटुंबसंस्था, शिक्षणसंस्था, न्यायसंस्था, राज्यसंस्था इत्यादी संस्था उभारल्या आहेत. निसर्गाशी त्याचे हे जे द्वंद्व आहे, ते त्याच्या भौतिक विकासास कारणीभूत ठरले आहे.
            मात्र, या द्वंद्व प्रक्रियेमुळेच माणसाच्या मनात निसर्गापासून तुटलेपणाची जाणीव निर्माण होते. या तुटलेपणास परात्मभावअसे नाव आहे. हा परात्मभाव मानवाच्या मनात व्याकुळता निर्माण करतो. या व्याकुळतेचे मूळ माणसाच्या नैसर्गिक असण्यामध्ये, त्या असतेपणाच्या जाणिवेमध्ये असते. या जाणिवेसच बीईंग’ (Being) आणि द्वंद्वनिष्ठ विकासास बिकमिंग’ (Becoming) असे म्हणतात. यापैकी बीईंगमागील मूल्यभाव कालातीत, तर बिकमिंगमागील मूल्यभाव कालसापेक्ष म्हणजे समाजसापेक्ष असतो. आश्चर्य म्हणजे बीईंगमागील समाजनिरपेक्ष मूल्यभावास कालपरत्वे दया- क्षमा- अहिंसा, स्वातंत्र्य- समता- बंधुता अशी नावे मिळतात. उलट बिकमिंगमागील समाजसापेक्ष मूल्यभाव संयम-शिस्त-विवेक, मुक्ती, न्याय, पुरोगामित्व इत्यादी शब्दांनी ओळखला जातो.
            मुक्तिबोधांच्या मते, हे मानुषतामूल्य जीवनतत्त्वही आहे, साहित्यतत्त्वही आहे आणि साहित्यकृतीच्या प्रतवारीचा तो निकषही आहे. सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्यया ग्रंथाच्या ८ व्या आणि ९ व्या प्रकरणामध्ये मुक्तिबोधांनी मानुषतेचे विस्तृत स्पष्टीकरण केले असून अखेरीस एडीपस रेक्स’ (सोफोक्लीज), ‘हॅम्लेट’ (शेक्सपिअर) आणि मेटामॉर्फोसिस’ (काफ्का) या जगप्रसिद्ध कलाकृतींना सूचकपणे लावूनही दाखवले आहे.
            शरश्चंद्र मुक्तिबोध हे नागपूरच्या नागपूर महाविद्यालयामध्ये मराठीच्या पदव्युत्तर वर्गास दीर्घकाळ साहित्यशास्त्राचे अध्यापन करीत असत. नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन वैशिष्ट्य म्हणजे, साहित्यशास्त्राच्या पत्रिकेत घटक न नेमता पूर्ण बीजग्रंथ नेमण्याची पद्धत होती. त्यामुळे भारतीय साहित्यशास्त्र’ (ग. त्र्यं. देशपांडे), ‘अॅरिस्टॉलचे काव्यशास्त्र’ (गो. वि. करंदीकर), ‘सौंदर्य आणि साहित्य’ (बा. सी. मर्ढेकर) हे ग्रंथ संपूर्ण अभ्यासास नेमलेले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे  साहित्यशास्त्रीय आकलनही कसदार झाले; तसेच सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्य’, (शरश्चंद्र मुक्तिबोध), ‘मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना’, (द. भि. कुलकर्णी ), ‘बाळ सीताराम मर्ढेकर’ (डॉ. यशवंत मनोहर), ‘रसचर्चा’ (डॉ. पद्माकर दादेगावकर) इत्यादी मोलाचे साहित्यशास्त्रीय व सौंदर्यशास्त्रीय ग्रंथही निर्माण झाले.
            मुक्तिबोधांच्या सृष्टी, सौंदर्य आणि साहित्यमूल्यया ग्रंथावरही ग. त्र्यं. देशपांडे यांच्या भारतीय साहित्यशास्त्रआणि बा. सी. मर्ढेकर यांच्या सौंदर्य आणि साहित्यया ग्रंथाची छाप स्पष्ट आहे. म्हणजे या ग्रंथाचे त्यांनी अनुकरण केले नसून त्यातील अनुकूल अशा तत्त्वाचे आत्मसातीकरण केले आहे. मुक्तिबोधानी वापरलेल्या अभिधा’, ‘लक्षणा’, ‘व्यंजना’, ‘एकार्थ’, ‘साधारणीकरण’, ‘स्व-गत’, ‘पर-गत’, ‘तटस्थ’, ‘रस ही परिभाषा किंवा ‘संवाद-विरोध’, ‘लय’, ‘संवेदना’, ‘संघटना’, ‘सौंदर्य’, ‘आत्मसंरक्षण’, ‘वंशसंवर्धन’ या संज्ञा-संकल्पना पाहिले की हे लक्षात  येते.
            केवळ ग्रंथच नव्हे काही तत्त्वज्ञानांचाही प्रभाव मुक्तिबोधांच्या या सिद्धांतावर आहे. उदा. अस्तित्ववाद’. या तत्त्वज्ञानातील, ‘अस्तित्व’ (Existence), ‘परात्मता’, ‘अस्तित्व-वेदना’, ‘सारतत्त्व’ (Essence) इत्यादी परिभाषा व संकल्पना त्यांनी मानुषतेच्या सिद्धांतासाठी आत्मसात केल्या.
            मात्र हे करताना त्यांनी आपला मार्क्सवादी पिंड कायम ठेवला आहे. तो विकसितही केला आहे. कालसापेक्ष भौतिक परिवर्तनआणि भौतिक परिवर्तनही त्यांची संकल्पना मार्क्सवादाशी सुसंगत आहे. तर कालनिरपेक्ष सनातन मानुषताही त्यातून उत्क्रांत झालेली पण त्याहून भिन्न अशी संकल्पना आहे.
            ललित वाङ्मयकृती ही एक वास्तुनिष्ठ भाषिक संघटना असते, तिच्यात सृष्टीमध्ये सार्वत्रिक असलेले लयतत्त्व असते. ती सुंदर असते, (मर्ढेकर), किंवा निर्मात्याचे व आस्वादाकाचे साधारणीकरण होत असते, त्यामागे आप-पर-तटस्थतारहित भूमिका असते. ललितसाहित्याच्या भाषेमध्ये एकार्थ (व्यंग्यार्थ) असतो (अभिनवगुप्त). ललित वाङ्मयकृती प्रतिमापूर्ण असते. तिला भावनासूचक सुरावली असते (आधुनिक समीक्षा) इत्यादी विवेचन पाहिल्यास मुक्तिबोधांच्या व्यासंगाचा परिचय होतो.
            सैद्धांतिक अभिनिवेश वा वैचारिक चलाखी यांच्या आहारी न जाता सत्यशोधकाच्या तळमळीने मुक्तीबोधांनी स्वत:चे व इतरांचे विचार तपासत मानुषतेचा व्यामिश्र व सूक्ष्म सिद्धांत मांडला आहे. हे करताना त्यांनी त्यांच्याही नकळत प्रतीपक्षीयांच्या परिभाषेचे आणि सिद्धांताचे ज्यादा सुलभीकरण केले आहे. स्वत:चा विचार व विशेषत; त्याचे उपयोजन पुरेशा विस्ताराने केले नाही. अर्थात भावी अभ्यासकांनी ते करणे गरजेचे आहे.
            अशाप्रकारे मुक्तिबोधांनी अभिनवगुप्ताचे रसतत्त्व, भारतीय साहित्यशास्त्रातील पुरुषार्थनिष्ठा, मर्ढेकरांचे लयतत्त्व आणि सौंदर्यविचार नाकारला आहे, आणि मानुषतेचा आपला सिद्धांत मांडून त्याचे उपयोजनही करून दाखवले आहे. त्यांनी दिलेला हा समीक्षेचा निकष आता पुढील अभ्यासकांनी तपासायचा आहे.
नागपूर, १४ एप्रिल, १९९८

§  अभ्याससाधने :            
         अरुणा देशमुख, मराठीतील लौकिकतावादी साहित्यविचार, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर,  १९९५
         . ना.  पेडणेकर, साहित्यमूल्यांची समीक्षा, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००४
         ग. त्र्यं. देशपांडे, भारतीय साहित्यशास्त्र, पॉप्युलर प्रकाशन, मुंबई, १९८० (ति. आ.)
         बा. सी. मर्ढेकर, सौंदर्य आणि साहित्य, मौज प्रकाशन गृह, मुंबई, १९६० (दु. आ.)
         द. भि कुलकर्णी, मर्ढेकरांचे सौंदर्यशास्त्र : पुन:स्थापना, (दु. आ.) पद्मगंधा प्रकाशन, पुणे, २००९
         रा. भा पाटणकर., मुक्तिबोधांचे साहित्य, मौज प्रकाशन, मुंबई, १९८६
          शरश्चंद्र मुक्तिबोध,   सृष्टीसौंदर्य आणि साहित्यमूल्य (दु. आ.), लोकवाङमय गृह, मुंबई, १९८७ :
डॉ. देवानंद सोनटक्के, पंढरपूर
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
पूर्वप्रसिद्धी 
१. अक्षरवाङ्मय, नांदेड, ऑक्टो-नोव्हे-डिसे. २०१३
२. ‘समीक्षेची अपरूपे’,हर्मिस प्रकाशन, पुणे, २०१७



             
  

  

 
             


द. भि. : सहवासाचे जंतरमन्तर : डॉ. देवानंद सोनटक्के

  दभि : सहवासाचे जंतरमंतर :    डॉ.   देवानंद सोनटक्के वर्ष १९९६. त्यावेळी मी एम . ए . साठी नागपूर विद्यापीठ कॅम्पसमध्ये मराठी विभागात...